साधू संतांचा महाराष्ट्र आहे. इकडे धैर्याला, शिस्तीला, जिद्दीला कोणी कमी नाही आणि लढायला तर आम्ही मागेपुढे बघतच नाही. लढणार आणि जिंकणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई:- आज दि 4 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:आज मी काही बोलण्याआधी सोलापूरच्या आराध्या नावाच्या चिमुकलीचे कौतुक करणार आहे. आराध्याचा आज ७ वा वाढदिवस आहे. हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घेण्याचे, वाढदिवस साजरा करण्याचं आहे पण आराध्याने आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.हीच आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आता मला खात्री आहे जर ही समज ७ वर्षांच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा, समजा नाही जिंकलच!देश कोणताही असो, जात, पात, धर्म कोणताही असो, व्हायरस एकच आहे आणि त्याचा दुष्परिणाम एकच आहे.
या युद्धामध्ये मला एका गोष्टीचे समाधान आहे की सर्व जण जात, पात, धर्म, पक्ष बाजूला ठेऊन आपल्याबरोबर आले आहेत.माननीय प्रधानमंत्री चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनिया जी यांनी फोन केला होता. पवार साहेब सोबत आहेत. सर्व धर्मगुरू सोबत आहेत. काही मौलवी माझ्या संपर्कात आहेत.अनेक हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी उघडून दिली आहेत, काही जणांनी हॉस्पिटल्स दिली आहेत. काही संस्था पुढे येऊन जेवणाचे वाटप करत आहेत. काही जणं पैसे देत आहेत. या सगळ्यांना मी मनापासून तमाम महाराष्ट्राच्या वतीने हात जोडून धन्यवाद देतोय.जसा कोविड-१९ हा व्हायरस आहे, तसा आणखी एक व्हायरस आपल्या समाजात दुही माजवण्याचं काम करतो. त्या व्हायरसला मी सांगू इच्छितो की मी विनंती व आवाहन करेन ते माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि बांधवांसाठी. त्यांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, कोणत्याही टोकाचे पाऊल उचलेन.जर कोणी कोणत्याही प्रकारचे फेक व्हिडिओ मग ते नोटांना थुंकी लावून पसरवणे, वेगवेगळे इशारे देणे असं कोणी केलं तर मी माझी जनता कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही.जात, पात, धर्म, पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन आज जणु काही जग, देश, महाराष्ट्र एकवटला आहे, या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी माझ्या महाराष्ट्रात सहन करणार नाही, अजिबात तो मी करू देणार नाही.४९०-५०० च्या आसपास पॉझिटीव्ह रुग्ण आपल्याकडे सापडले आहेत, त्यापैकी ५१ जणं ते आता बरे होऊन घरी गेले आहेत.
ही लढाई आता जोरात आली असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची. आपल्या घरात मातापिता आहेत, इतर कोणी ज्येष्ठ असतील त्यांची काळजी घ्यायची आहे.रोज काही जणांची यादी आपल्याकडे दिल्लीतून येते की ही लोकं राज्यात आलेत का हे तपासा, आजपर्यंत जितक्या लोकांची यादी आपल्याला दिल्लीतून प्राप्त झाली त्यापैकी १००% लोकांचा शोध आपण लावला आहे आणि हे सर्व जण आपल्या सरकारी विलगीकरण कक्षात आहेत.पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय, धार्मिक, क्रिडा या प्रकारचा उत्सव होणार नाही, त्याला परवानगी दिली जाणार नाही.आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास मजूर आहेत, त्यांच्या २ वेळेच्या जेवण, १ वेळचा नाश्ता, डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आपण देत आहेत, या सगळ्या सुविधा आपण केलेल्या आहेत.महाराष्ट्रात जे इतर राज्यातील लोकं आहेत, मजूर आहेत, तुम्ही ज्या कॅम्पमध्ये आहात त्याच कॅम्पमध्ये रहा, इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने तुमची काळजी घेत आहे.अतिरेक्यांचे लक्ष मुंबईकडे असतं तसं या व्हायरसच लक्ष मुंबईकडे आहे. पण मुंबईमध्ये काही करू शकणार नाही कारण मुंबईकर घट्ट, सक्षम, जिद्दी आहेत. एकजूट हे मुंबई आणि महाराष्ट्राचे वेगळे रूप आहे.माझा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, माझ्याकडे आत्मविश्वास आहेच कारण माझे आजोबा, माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख सांगायचे की आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणी थांबवु शकत नाही.आपला महाराष्ट्र शुरांचा, वीरांचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. इकडे धैर्याला, शिस्तीला, जिद्दीला कोणी कमी नाही आणि लढायला तर आम्ही मागेपुढे बघतच नाही. लढणार आणि जिंकणार!