संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)– जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव सह बहुतांश तालुक्यात मागील ३० दिवसापासून पावसाचा खंड पडलेला असून खरिप हंगामातील पिकांची वाढ खुटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित केल्यास पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकणार आहे. तश्या सूचना नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ना.गिरिषभाऊ महाजन यांनी दिल्या होत्या. चाळीसगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पत्र दिले असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रत्यक्ष पाहणी वेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना असे लक्षात आले आहे की, चाळीसगाव तालुक्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका इ.पिकांची वाढ खुटली असून काही भागात पिकांना पाणी उपलब्ध न झाल्याने पिक सुकवत आहेत. या बाबत बहुतांश शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा लाभ घेतलेला असून आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या दि.२६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवल्याने म्हणजेच एका महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५ mm पेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देय आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित केल्यास पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकेल.
चाळीसगाव तालुक्यातील ९ पैकी ५ मंडळांमध्ये गेल्या २१ दिवसात पावसाची नोंद झाली नसल्याने ते २५ टक्के नुकसानभरपाईच्या निकषात पात्र ठरत आहेत, इतर ४ मंडळांमध्ये देखील सारखीच परिस्थिती असल्याने ते मंडळ देखील निकषात बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. तसेच पीकविमा नोंदणी मध्ये देखील चाळीसगाव तालुका जिल्ह्यात अग्रेसर असल्याने या नुकसानभरपाईचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.