परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करा – महापौर
पुणे(प्रतिनिधी)-१९ मार्च २०२० पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. त्यातील बहुतांश रुग्णांना ते परदेशातून देशात आल्याची पार्श्वभूमी आहे. आपण परदेशातून परतणार्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाणारे हे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत.
पुण्यातील घटनांमध्ये हे प्रकर्षाने जाणवले असून, त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.