पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदाचा वाद,आता ग्रामविकास मंत्र्यांच्या दरबारात ?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदाच्या वादासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव व उपसचिव यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत तर ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुरू असलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया थांबवून मोकळे झाले आहेत .तसे पत्रच त्यांनी जिल्हा परिषदेला दिनांक ०४ ऑगष्ट २०२२ रोजी दिले आहे .
एकंदरीतच पुणे जिल्हा परिषदेतील १२ वर्ष रखडलेल्या मुख्याध्यापक पदोन्नतीचे १२ वाजले असून कोणताही वरिष्ठ अधिकारी या विषयावर स्पष्टपणे बोलायला व जिल्हा परिषदेला आदेश द्यायला तयार नाही .एकंदरीतच बारा वर्षापासून प्रलंबित असलेला पुणे जिल्हा परिषदेमधील मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही असेच दिसून येत आहे .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ हा मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे .परंतु २०१० व २०११ ला मुख्याध्यापक पदोन्नती होताना खूप मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे . या सर्व आर्थिक व्यवहाराची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे .या कारणामुळेच विभागीय आयुक्त पुणे व मा . मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न बारा वर्षापासून रेंगाळलेला आहे .त्यामुळे सामान्य उपशिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करावे लागत आहे .त्याला कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही .या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला वरिष्ठही तयार नाहीत .हीच या विभागातील खरी शोकांतिका आहे .
या सर्व प्रकरणाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,मा .मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे . ती सुरू करण्याबाबत ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी ताबडतोब सूचना देणे आवश्यक आहे .तसेच ग्रामविकास विभागातील ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्हा परिषद पुणे येथील मुख्याध्यापक पदोन्नती बारा वर्षे रखडलेली आहे ,त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना स्वयं स्पष्ट सूचना देण्यात येऊन मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे . .मुख्याध्यापक पदोन्नती रखडल्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत स्वतंत्र निवेदनात ग्रामविकास विभागाला सविस्तर माहिती दिलेली आहे .त्याची दखल अद्याप घेतलेली दिसून येत नाही .त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मांडला आहे .ते या निवेदनावर कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या ६ व्या राऊंडमध्ये बदली झालेल्या २४१ शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवर कायम ठेवण्यात आल्याबद्दलचे आदेश ग्रामविकास विभागाने निर्गमित करावेत अशी विनंती ही ग्रामविकास मंत्री ,प्रधान सचिव व उपसचिव यांना करण्यात आली आहे .