निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो -सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे : ३ मे, २०२२ : निराकार परमात्म्याला पाहून,जाणून त्याच्याशी प्रेमाचे नाते जोडल्यानेच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो आणि जीवनामध्ये आनंदाची अनुभूती प्राप्त होते असे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज यांनी सोमवार दिनांक २ मे २०२२ रोजी महालक्ष्मी लॉन्स, वाघोली येथे विशाल रूपात आयोजित केलेल्या एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्याव्यतिरिक्त नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद येथील हजारो निरंकारी भक्तांनी सद्गुरुंच्या दिव्य दर्शनाचा व अमृतमय प्रवचनाचा आनंद प्राप्त केला .
भाविक भक्तांना संबोधित करताना सद्गुरू माताजी म्हणाल्या की ,जेव्हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुःखी होते आणि परमात्म्याला दोष द्यायला सुरुवात करते; परंतु आमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे परमात्म्याला ठाऊक असते .परमात्मा सर्व शक्तिमान आहे आणि घटाघटातील जाणनारा आहे. मानवी मनाच्या वेगवेगळ्या अवस्था समजावताना सद्गुरू माताजींनी उदाहरण दिले की ,एकाच बागेत गेलेल्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती फुलांचा सुगंध आणि सौंदर्य पाहून प्रसन्न होते तर दुसरी व्यक्ती फुलांसमवेत असलेले काटे पाहून दुःखी होते . आपण जेव्हा या मनाचे नाते निराकार प्रभू परमात्म्याशी जोडतो तेव्हा सर्वांभूती याचेच रूप दिसू लागते;मात्र हे नाते जोडलेले नसेल तर मन इतरांमधील उणीवा शोधत राहते .
आध्यात्मिकता प्रत्येकाच्या जीवनाचा आधार बनून सर्वानी एकमेकांसोबत प्रेमाने राहावे अशी शुभकामना सद्गुरू माताजींनी समस्त मानव मात्रासाठी व्यक्त केली.
संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी श्री. ताराचंद करमचंदानी यांनी सद्गुरू माताजींचे मनापासून आभार व्यक्त केले आणि प्रशासनाद्वारे दिल्या गेलेल्या सहयोगाबद्दल त्यांना धन्यवाद दिले .