पर्यावरण, आरोग्यासाठी एकवटले सायकलप्रेमी प्रदूषणमुक्त भारत’ संदेश देण्यासाठी सायकल प्रवासातून घातला जातोय आदर्श
‘
चाळीसगाव – शहरातील व्यापारी, व्यावसायिक आपल्या दिवसभराचा शिण घालविण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी दररोज पहाटे सायकल फेरी काढत असून तालुक्यालगत असलेला निसर्गरम्य परिसर, मंदिर, शहरात जे पर्यावरण विषयी उपक्रम चालतात तेथे ते मदत करुन खारीचा वाटा उचलत आहेत. ‘सायकलप्रेमी’ या ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण वाचण्यासाठी थोडी फार मदत होत असून काम करण्यासाठी एक नवीन उर्जा आणि प्रेरणा मिळत असून सायकल फेरफटका मधून समविचारी मित्र मंडळी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचे काम केले जात आहे.
सायकल फेरीची सुवर्णा स्मृती उद्यानापासून सुरुवात होते. दररोज ३० ते ४० किलोमिटरचा सायकल प्रवास हे व्यापारी बांधव करीत असून या ग्रुपमध्ये शहरातील व्यापारी व्यावसायिक यांच्यासमवेत विविध भागातील नागरीकांचा समावेश आहे. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. परिणामी, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘प्रदूषणमुक्त भारत’ हा संदेश देण्यासाठी हे तरुण सायकल प्रवास करत आदर्श घालून देत आहेत.
प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून वाहने देखील या प्रदूषणात भर घालतात. त्यामुळेच सायकलचा वापर करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश देशाला देण्याचा ध्यास घेतला असून निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने मनातील ताणतणाव निघून जातो तर मन ताजेतवाने होऊन पुन्हा काम करायला संपूर्ण दिवस पुरेल एवढी ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे यांनी सांगितले. चाळीसगाव लगतच्या परिसरात विविध ठिकाणी सायकलवर जाऊन तो भाग पाहण्यात एक वेगळाच आनंद असून ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिली जात असल्याने लोकांशी या निमित्ताने संवाद साधला जात असल्याचे विकास शुक्ल यांनी यावेळी सांगितले.
पाटणादेवी, औट्रम घाट, कजगांव, हिरापूर, देवळी या भागात सायकल फेरफटक्याच्या माध्यमातून अनुभूती साधली जात आहे. पर्यावरणाचा अनुभव वेगवेगळ्या स्वरुपाचा असून सायकल फेरफटका मधून जास्तीत जास्त सायकलप्रेमी मित्र तयार व्हावे म्हणून प्रयन्न केला जात असल्याचे सायकलप्रेमींनी सांगितले. यात अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, विकास शुक्ल, टोनी पंजाबी, सोपान चौधरी, महेश महाजन, निलेश कोतकर, सुरेश मंधाणी, प्रितेश कटारिया, चेतन पल्लण, लिलाधर पाटील, मयुर शिंदे, हर्षद जैन, सौरभ गुप्ता, भूषण एडके, विनायक चव्हाण आदी सायकलप्रेमी या मोहीमेत सहभागी झाले आहेत.