वनविभाग हद्दीत चंदन तस्करांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई,22 किलो लकडासहित आरोपी ताब्यात…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरापासून जवळच असलेल्या पाटणादेवी वनविभागाच्या हद्दीत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता.२०) रोजी चंदन तस्करांवर कारवाई करत एकास चंदनाच्या २२ किलो लाकडासहित अटक केली असून इतर चंदन तस्करांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाटणादेवी जंगल परिसरात लाभलेले मोठे अभयारण्य व औषधी वनस्पती तसेच या जंगलात असलेली गारगोटी,चंदनाची झाडे हा निसर्गाचा मौल्यवान ठेवा या ठिकाणी आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात चंदनाच्या लाकडाची व गारगोटीची तस्करी केली जाते. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी या परिसरातच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर चंदन तस्करांनी गोळीबार केला होता याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवारी (ता.२०) रोजी चंदन तस्कर जंगलातून चंदनाच्या झाडातील गाभ्याची चोरी करत असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी २ पथक तैनात करत त्या ठिकाणाहून सादिक नबीखा पठाण रा.कुंजखेडा,भिल्ल वस्ती ता. कन्नड जि. औरंगाबाद यास पकडले त्याचे साथीदार रात्रीच्या वेळी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सादिकला पोलिसांनी विचारपूस केली असता सादिकने सदरील चंदनाच्या झाडाची गाभा असलेली लाकडे पिंपरखेड शिवारातील नदीकाठावर असलेल्या ठिकाणाहून व शिवापूर शिवारातील गोमुख जवळील वन विभागाच्या जंगलातून १० ते १२ झाडे तोडून गाभा चोरल्याचे कबुली दिली चंदनाचा २२ किलो वजनाचा गाभा व एक मोटरसायकल असा एकूण १,१०,०००/ किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ निखिल निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण संगेले हे करीत आहे.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, लोकेश पवार, पोहेका युवराज नाईक, प्रवीण संगेले, नंदलाल परदेशी, पोना भूपेश वंजारी, संतोष शिंदे, नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, पोका हिराजी देशमुख, निखिल निकम, पोना नंदकुमार जगताप, भगवान माळी, मनोज पाटील, चापोना मनोहर पाटील हे होते.
वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळेच तस्करांना अभय ?
पाटणादेवी अभयारण्यातून आत्तापर्यंत अनेक चंदनाची झाडांचा गाभा,गारगोटी चोरून नेली मागील वर्षांमध्ये गोमुख परिसरातील जंगलातून अनेक चंदनातील झाडात गाभा चोरून नेला होता या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती मात्र ती चौकशी व अहवाल आजही गुलदस्त्यातच आहे. त्या चौकशीचा खुलासा करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. वनविभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे चंदन तस्करांना अभय मिळत असल्याचे कळते.