स्ट्रीट लाईट बिल ग्रामपंचायतीने भरावी असा कोणताही राज्य शासनाचा आदेश नाही म महावितरण कंपनीची सक्ती का-किसनराव जोर्वेकर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील महावितरण कंपनीचे अधिकारी बेकायदेशीररित्या व मनमानी पद्धतीने जनतेला जुलमी पद्धतीने वीज आकारणी व वसुली करत असल्याने त्यांच्या हुकुमशाही पद्धतीच्या विरोधात आज टाकळी प्र.चा. गावचे उपसरपंच व महाराष्ट्र सरपंच असोसिएशनचे कार्याध्यक्ष, श्री किसनराव जोर्वेकर यांनी आज टाकळी प्र.चा. ग्रामपंचायत कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले ,की ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील स्ट्रीट लाईटची वीज बिले ग्रामपंचायत कधीच भरत नव्हती. तर स्ट्रीट लाईटची वीजबिले ही त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा मार्फत भरली जात होती .स्ट्रीट लाईट बिल ग्रामपंचायतीने भरावी असा कोणताही आदेश राज्य शासनाचा नाही, किंवा या संदर्भातली कोणतीही सूचना किंवा आदेश ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला नाही.
स्ट्रीट लाईटची वीजबिले ग्रामपंचायतीकडून वसूल करावी असा आदेश देखील वीज वितरण कंपनीला राज्य शासनाने दिलेला नाही. असे असताना थकित लाईट वीज बिलाच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीच्या चाळीसगाव येथील कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता ग्रामीण विभाग यांच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील स्ट्रीट लाइटचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील स्ट्रीट लाईट चे कनेक्शन खंडित करण्यास किंवा तोडण्यास टाकळी प्र चा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आणि महाराष्ट्र सरपंच असोसिएशनचे कार्याध्यक्ष किसनराव जोर्वेकर यांनी विरोध केला आहे.
वीज वितरण कंपनीच्या मनमानी आणि हुकूमशाही च्या विरोधात चाळीसगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीने स्ट्रीट लाईट थकित वीज बिलापोटी ग्रामपंचायतीकडे 30 ते 40 लाख रुपयांची मागणी केली आहे सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे शिवाय उन्हाळा देखील कडक आहे .
वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अनेक समस्या निर्माण केले आहे अशातच वीज वितरण कंपनीने स्ट्रीट लाइटचा वीज पुरवठा खंडित केला तर गावा गावामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल त्यातून गुन्हेगारीला देखील वाव मिळणार आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आणि स्थितीत लाईटचे थकीत वीज बिल कोणी भरावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासकीय पातळीवर होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वीज पुरवठा खंडित न करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी जोर्वेकर यांनी जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता जळगाव यांच्याकडे केली असून त्याची एक प्रत जळगावचे खासदार उन्मेश पाटील चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख तसेच वीज वितरण कंपनीचे चाळीसगाव येथील अभियंता शेंडगे, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री हर्षवर्धन जगताप यांना दिली आहे .त्याच बरोबर
चाळीसगाव तालुक्यातील सर्व सरपंचांनी ,वीज वितरण कंपनीच्या बेकायदेशीर व मनमानी कारवाईला विरोध करण्याचे आव्हान देखील किसनराव जोर्वेकर यांनी केले आहे