अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहर व परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून उकाड्यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे.
सध्या वातावरणात प्रचंड उष्मा असून त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पंखे, कुलर आणि अन्य विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.
दुसरीकडे शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उकाडा आणि डासांच्या त्रासामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी असताना वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता असल्याने आतापासूनच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेने फवारणी व स्वच्छता मोहिमेला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
