अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तृतीयपंथीय समाजाच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारातून चाळीसगाव येथे स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि २ जुन रोजी करण्यात आले होते. या शिबिराला चाळीसगाव, पाचोरा व परिसरातील तृतीयपंथीय बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जळगाव तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा होता.
शिबिरात स्वयंरोजगार, व्यवसाय उभारणी, शासकीय कर्ज व अनुदान योजना, बीज भांडवल योजना, ओळखपत्रे, आवश्यक दाखले तसेच विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
कार्यक्रमात विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी, उद्योग निरीक्षक प्रियंका पाटील, विस्तार अधिकारी गौरव पोखरना, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक गणेश वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तृतीयपंथीय बांधवांना उद्योग-व्यवसायाच्या संधी, शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
पाचोरा येथील सीमा जान (गुरू) व चाळीसगाव येथील फिजा गुरू यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. यावेळी समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक महेंद्र पाटील यांनी तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन बार्टी व समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले, तर सागर वीसे यांनी आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन चौधरी, महेंद्र कुमावत, दर्शन कुमावत, ज्ञानेश्वर लिंगायत, अर्जुन गायकवाड, स्नेहा बोरसे आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती, आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी आणि उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
