अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-भडगावकडून चाळीसगाव शहरात अवैध वाळू वाहतुकीचा धुमाकूळ सुरू असून वाळू माफियांनी जणू प्रशासनालाच खुले आव्हान दिले आहे. खरजई नाक्यावरून रात्रीच्या अंधारात एका मागोमाग एक वाळूने भरलेले डंपर शहरात दाखल होत असताना संबंधित यंत्रणांची मात्र संशयास्पद शांतता पाहायला मिळत आहे.
रात्रगस्तीचे दावे करणारे पोलीस आणि अवैध गौण खनिजांवर कारवाईची जबाबदारी असलेले महसूल पथक नेमके काय करत आहे,असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डंपरांची वर्दळ सर्वसामान्यांना दिसते,मग ती प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटते, याचे कोडे नागरिकांना पडले आहे.
रात्रीच्या वेळी भडगाव कडून खरजई नाक्यावरून शहरात हे डंपर शहरात प्रवेश करत असतात तरी संबंधित यंत्रणा मात्र याकडे सोईसकर दुर्लक्ष करत आहे की त्यांना याबाबत काही माहीत नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.वाळू माफियांच्या डंपरांवर कारवाई न होण्याचे नेमके कारण प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चाही शहरात रंगू लागली आहे.
“डंपर धावत आहेत, वाळू वाहते आहे,मग कारवाई कुठे अडकली आहे?” हा प्रश्न आता चाळीसगावकरांच्या ओठावर आला आहे. वाळू माफियांच्या या रात्रीच्या परेडला प्रशासन कधी लगाम लावणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिनांक ४ जून रोजी मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस तथा महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले मात्र ही निवेदन देत चार दिवस उलटून देखील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे.
