अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, चाळीसगाव विभागाच्या वतीने किल्ले मल्हारगडावर दुर्गसंवर्धनाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गडावरील ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यात साचलेला गाळ, माती व कचरा काढून टाक्याची स्वच्छता करण्यात आली.
मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दुर्गसेवकांनी श्रमदान करत टाक्यातील मोठ्या प्रमाणातील गाळ बाहेर काढून ऐतिहासिक जलस्रोताच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. पावसाळ्यात अधिक जलसाठा होऊन या पुरातन टाक्याचे जतन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी सांगितले की, टाक्यात अद्याप काही प्रमाणात गाळ शिल्लक असून आगामी दुर्गसंवर्धन मोहिमांमध्ये तो पूर्णपणे काढण्यात येणार आहे. गडकोटांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असून या मोहिमेलाही दुर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगाव विभागातील अनेक दुर्गसेवकांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक जलस्रोतांचे जतन होण्यास मदत होणार असून दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृतीही अधिक प्रभावीपणे होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
