कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे
जळगाव दि. 12 : कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घ्यावी. जेणेकरुन या विषाणूचा प्रतिबंध करणे शक्य होईल. सर्वसामान्य नागरीकांनी प्रतिबंधासाठी मास्क वापरण्याची आवश्यकता नसून त्याऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांनी जिल्ह्यातील नागरीकांना केले आहे.
कोरोना विषाणूबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनी उपस्थितांना सूचना केल्यात. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. रावळ, यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह इतर 7 देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसेच सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. समाजमाध्यमांवर कोणीही चुकीचे संदेश पसरवू नये असून सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्ह्यातील ट्रॅव्हल कंपनीमार्फत पर्यटनासाठी परदेशात गेलेल्या तसेच जिल्ह्यातील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी पर्यटकांचीही माहिती घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात.
डॉ. बेडसे म्हणाले की, जिल्ह्यातील ट्रॅव्हल कंपन्यांनी तूर्त परदेशी यात्रांचे बुकींग करु नये. तसेच आपल्या कंपनीमार्फत पर्यटनासाठी परदेशात गेलेल्या नागरीकांची माहिती, ते परत कधी येणार याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. जळगाव विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची माहिती विमान प्राधिकरणाकडून घेण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मॉलधारक, सिनेमागृह चालकांनी जास्तीत जास्त स्वच्छता बाळगावी. रेल्वेस्टेशन, बसस्टॅन्ड व गर्दीच्या ठिकाणी महानगरपालिका व संबंधित यंत्रणेने स्वच्छता ठेवावी.
कोरोना विषाणूचा प्रसार हा 60 वर्षावरील नागरीकांमध्ये लवकर होतेा. तसेच शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे होत असल्याने नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, दिवसातून किमान चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावेत. यात्रा, जत्रा व गर्दीच्या ठिकाणी नागरीकांनी जाण्याचे टाळावे, एकमेकांशी बोलतांना अंतर ठेवून बोलावे, तसेच बक्षिस वितरण, स्नेहसंमेलन, मेळावे, परिषदा, सांस्कृतिक कार्यक्रम व गर्दी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करु नये. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार घेणा-या रुग्णांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याचे आवाहनही डॉ. बेडसे यांनी केले.