त्वरित राज्यपालांनी शिवप्रेमींची माफी मागावी जनआंदोलन खान्देश विभागाचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल?असे वादग्रस्त वक्तव्य औरगांबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात केले असून त्यांचे हे विधान निषेधार्थ असून राज्यपालांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी,मा मुख्यमंत्री सो., गृहमंत्री सो., यांना जनहितार्थ निवेदन जनआंदोलन खान्देश विभागाचे प्रा.गौतम निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकार्यांनी इतिहासतज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारत घेतल्यानंतर न्यायालयात सादर केल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरूशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही असे आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अवमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला असून राज्यपाल सारख्या पदावर कार्यरत असतांना खरा इतिहास माहीत करून न घेता संघी मनुवादी अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी त्यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व निषेधार्थ असून त्यांनी मनुवादाला अभिप्रेत असलेली भूूमिका जाणीवपूर्वक घेतली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे त्यांनी त्वरित आपले विधान मागे घेत माफी मागावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभाग ने केली आहे.
निवेदनावर जन आंदोलन खान्देश विभाग प्रा गौतम निकम,शत्रुघ्न नेतकर,विजय शर्मा,योगेश्वर राठोड,आबा गुजर बोरसे,नाशीर भाई शेख,मिलिंद अशोक भालेराव,गणेश भोई,प्रदीप चौधरी,अशोक राठोड,आर के माळी सर,सागर नागणे,संदिप पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.