अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर व तालुक्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी तसेच भडगावकडून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने अंकुश आणण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चाळीसगावची ओळख राज्यभर “दुधाचे आगार” म्हणून आहे. अशा परिस्थितीत दूध, तूप, खवा, पनीर, पेढे व इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रे, डेअरी, मिठाई दुकाने, खवा-पनीर उत्पादक व विक्रेते तसेच खाद्यतेल विक्रेत्यांची संयुक्त तपासणी मोहीम राबवून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासोबतच भडगावकडून चाळीसगावच्या दिशेने सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीबाबतही निवेदनात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी डंपर व इतर जड वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याबरोबरच पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.अवैध वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी खरजई नाका व नागद चौफुली परिसरात रात्रीचे बैठे गस्ती पथक तैनात करावे, महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग उभारून संशयित वाहनांची तपासणी करावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, डॉ. अजय पाटील, समाधान पाटील, दिनेश पाटील, गोरख साळुंखे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दिन शेख, चेतन देशमुख, किशोर जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आणि नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या अवैध वाळू माफियांवर प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.
