‘लॉकडाऊन’मध्ये सरसावले मदतीचे हात ; समाजसेवकांकडून भटके अन निराधारांना जेवणाची व्यवस्था
चाळीसगाव – ‘गो कोरोना गो’ म्हणत सर्वजण आपापल्या घरात बसून एक झाले आहेत. मात्र अशाही स्थितीत पोलिस, पत्रकार, सरकारी डॉक्टर, परिचारिका यांनी आपली सेवा कायम ठेवत देशसेवा सिमेवर नव्हे तर आपल्या गावात कार्य करीत आहेत. कोरोनाचे भूत मानगुटीवर बसले असताना अशा काळात गोरगरीब व दुर्लक्षित असलेल्या भटक्या नागरिकांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम शहरातील समाजसेवक गेल्या ५ दिवसापासून सातत्याने करीत आहेत
कोरोनाने देशातील घडामोडी रविवारी स्तब्ध झाल्यात. लोकांनी घरी राहून कोरोना हटावसाठी मानवतेची साखळी तयार केली. निर्मनुष्य रस्ते, ओस पडलेल्या शाळा, शटर डाऊन असलेले हॉटेल्स असे सारे धीरगंभीर वातावरण असल्याने खऱ्या अर्थाने समाजसेवकांच्या या कार्यातून ‘मानवतेच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु’ या म्हणीचा प्रत्यय गेल्या पाच दिवसापासुन येत आहे. शहरातील अभिजीत शितोळे, स्वप्नील कोतकर, स्वप्निल धामणे, हर्षल ब्राह्मणकर, अभिलाष एसके यांनी शहरातील भटके लोक यांना खाण्यापिण्याची सेवा देत आपल्या समाजमनाचा आरसा जपला आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारहाट, घाट रोड आदी ठिकाणी जाऊन जेवणाची पाकीटे देत दुर्लक्षित घटकांना पुरविलेली सेवा खूप मदतगार ठरत आहे.